
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अस्थी विसर्जित न करता अस्थी व रक्षा ठेवून केले वृक्षारोपण; हिवरे येथील ओहोळ परिवाराचा आदर्श उपक्रम
करमाळा : व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराची उरलेली राख व अस्थी नदीत टाकल्याने जलप्रदूषण होत आहे व त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे ते टाळून हिवरे नागोबाचे येथील ओहोळ परिवाराने विठ्ठल गणपत ओहोळ यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी व रक्षा ठेवून शेतामध्ये वृक्षारोपण केले व एक प्रकारे त्या झाडांच्या माध्यमातून विठ्ठल ओहोळ यांच्या आठवणी जिवंत ठेवले आहेत व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत एक नवा आदर्श घालून दिला आहे.
हिवरे नागोबाचे येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल गणपत ओहोळ यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९३ व्या वर्षी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी निधन झाले. विठ्ठल ओहोळ हे अभंग, किर्तन, एकतारी भजन या माध्यमातून प्रबोधनाचे काम करत होते. तसेच ते वारकरी संप्रदायामध्ये गेले ४० वर्षापासून सहभागी होते.

अत्यंत कष्टमय जीवनातून गरीब परिस्थितीतून त्यांनी आपल्या परिवारास घडविले. विठ्ठल ओहोळ हे घडीव दगडांचे बांधकाम करण्यामध्ये माहीर होते. त्यांनी बांधकाम केलेले अनेक चिरेबंदी वाडे पंचक्रोशी मध्ये आजही डौलात उभे आहेत. त्या वाड्यांमधून विठ्ठल ओहोळ यांच्या कामाच्या स्मृती जिवंत आहेत.

विठ्ठल ओहोळ यांच्या निधनाने ओहोळ कुंटुब दुःखात बुडाले होते. विठ्ठल ओहोळ यांचा अंत्यविधी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी रक्षा (अस्थी) विसर्जित करण्याचा कार्यक्रम होणार होता.
दरम्यान, विठ्ठल ओहोळ यांची मुले प्रकाश ओहोळ(माजी पोलीस अधिकारी), शाहजी ओहोळ, अशोक ओहोळ व मुलगी अलका गायकवाड आणि नातू लेखक व वक्ते जगदीश ओहोळ यांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी वडिलांच्या निधनानंतर रक्षा व अस्थी नदीत विसर्जित न करता जुन्या पर्यावरणास हानिकारक परंपरेला नाकारून शेतात खड्डे खोदून खड्ड्यामध्ये वृक्ष लावून त्यामध्ये अस्थी विसर्जित केली. यावेळी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.