
खडतर परिश्रम घेतल्यास उत्तुंग यश संपादन करता येते : प्राचार्य मिलिंद फंड
करमाळा प्रतिनिधी : परिस्थितीवर मात करून खडतर परिश्रमातून उत्तुंग यश कसे संपादन करता येते याचे उदाहरण म्हणजे भरत जाधव. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी भरत अंकुश जाधव C.A. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी वरील गौरवउद्गार काढले.भरत जाधव हा सावडी या गावातील असून त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही इयत्ता 11वी व 12वी महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी पुणे येथे गेला. तेथे त्यांनी खडतर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर उत्तुंग संपादन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी वाणिज्य शाखेचे महत्त्व व वाणिज्य शाखेतून रोजगाराच्या विविध संधी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून माजी पर्यवेक्षक प्रा.एम.व्ही. कांबळे , उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी प्रा.संध्या बिले, प्रा.एन.व्ही. भोसले, प्रा.एम.बी. धिंदळे व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री.भरत जाधव यांनी C.A.च्या परीक्षेबद्दल व अभ्यासाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तसेच याप्रसंगी प्रा. एम.व्ही.कांबळे व महाविद्यालय प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मुन्नेश जाधव यांनी केले तर आभार प्रा.एन.व्ही. भोसले यांनी मानले.